Maharashtra Winter Session 2023 Nagpur । आज राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे. मात्र पहिल्याच दिवशी शेतकरी प्रश्नावर विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सध्या शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागतोय. याच गोष्टीचा विचार करून आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांनी ठाण मांडल. यावेळी संत्री, कापसाच्या बोंडांची माळ गळ्यात घालून सरकार विरोधात मोठी घोषणाबाजी केली.
सध्या बरसत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या शेतीपीकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हातबल झाला आहे. कापूस आणि सोयाबीनला म्हणावा असा भाव मिळत नाही. शेतकरी पुरता उध्वस्त झाला आहे. सरकार फक्त पंचनामे करत आहे मात्र शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नाही. अशा शब्दात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. (Maharashtra Hiwali Adhiveshan)
Tomato Rate । अमेरिकेत ‘या’ दराने विकला जातोय टोमॅटो, भाव वाचून तुम्हाला बसेल धक्का
त्याचबरोबर यावेळी विरोधकांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी मागणी देखील केली आहे. आम्हाला घोषणा नको शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला पाहिजेत. अशी मागणी देखील विरोधकांनी यावेळी केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये होत असून पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून ऐन थंडीतच नागपुरातील वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.
नाना पटोलेही आक्रमक
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी काँग्रेसने स्थगन प्रस्ताव दिला होता. मात्र सरकारने चर्चेपासून पळ काढला असा आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला आहे. खूप मदत दिली असं सांगून चर्चा टाळणं हा शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे. असे देखील यावेळी नाना पाटोळे म्हणाले आहेत.