Havaman Andaj । सध्या राज्यभर गणपतीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाला राज्यात अतिशय उत्साहात सुरुवात झाली आहे. यामध्येच आता पावसाने गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी जोरदार हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार दिवस पावसाचे हेच चित्र पाहायला मिळणार आहे. त्यामुळे रायगडसह संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये पाऊस कोसळताना दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही जर गणेशोत्सवानिमित्त बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर आधी पर्जन्यमानाचा अंदाज घ्या आणि मगच बाहेर पडा. (Havaman Andaj)
आज सकाळपासूनच मुंबई, नवी मुंबई आणि रायगड पट्ट्यामध्ये पावसाने दमदार सुरुवात केली आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार पुढील 24 तासांमध्ये राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर राज्यातील इतर भागांमध्ये पाऊस विश्रांती घेणार असल्याचे देखील हवामान विभागाने म्हटले आहे.
सध्या मध्य भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्यामुळे याचा परिणाम थेट आपल्याला कोकणामध्ये झालेला पाहायला मिळत आहे. ज्यामुळे कोकणातील घाट माथ्यावरील अनेक भागांमध्ये पाऊस दमदार हजेरी लावणार आहे. त्याचबरोबर सातारा आणि कोल्हापूर मधील घाटमाथ्यावर देखील पाऊस दमदार हजेरी लावणार आहे.
तसं पाहिलं तर राज्यात यावर्षी पावसाला उशिरा सुरुवात झाली आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदाच्या वर्षी पावसाची सुरुवात उशिरा झाल्याने परतीचा मुहूर्त देखील लांबणीवर पडला आहे. काही ठिकाणी पाऊस कोसळत असला तरी राज्यातील अनेक ठिकाणी अजूनही शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची आशा लागली आहे.