Havaman Andaj | सध्या राज्यभर नागरिकांना मोठ्या थंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे आणि यामध्येच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील दोन-तीन दिवस महाराष्ट्रात अवकाळी पाऊस कोसळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची योग्य ती काळजी घेण्याचे आव्हान देखील करण्यात आले आहे.
सध्या डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे आणि या बर्फवृष्टीमुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. याचा परिणाम आता महाराष्ट्रावर देखील दिसून येत आहे. मागच्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर मराठवाड्यात कडाक्याची थंडी पडली आहे. मात्र एकीकडे नागरिकांना थंडी जाणवत असताना दुसरीकडे हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवस मराठवाड्यासह विदर्भातील काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर राजधानी दिल्लीसह एनसीआरमध्ये मंगळवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला होता हवामान विभागाचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरला. मंगळवारी सकाळी दिल्ली नोएडा, गाजियाबाद आणि इतर भागात हलका पाऊस झाला.
Dairy Industry । दूध व्यवसायामुळे लागला संसाराला आर्थिक हातभार, कसं केलं नियोजन? जाणून घ्या..
शेतकऱ्यांची चिंता वाढली
सध्या शेतकऱ्यांची रब्बी पिके जोमात आहेत. मात्र अचानक पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. मागच्यावेळी कोसळलेल्या अवकाळी पावसाची अजून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही तोच दुसऱ्यांदा अवकाळी पाऊस कोसळल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत.